टाकळी येथे आंबेडकर जयंतीवर दगडफेक; आयोजकांवरच ३०७ चा गुन्हा, वंचितच्या हस्तक्षेपानंतर प्रांताधिकाऱ्यांनी गुन्हा मागे घेतला…!
टाकळी येथे आंबेडकर जयंतीवर दगडफेक; आयोजकांवरच ३०७ चा गुन्हा, वंचितच्या हस्तक्षेपानंतर प्रांताधिकाऱ्यांनी गुन्हा मागे घेतला...!

जिल्हा प्रतिनिधी :-कलीम सैय्यद
चाळीसगाव तालुक्यातील टाकळी येथे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव रात्री सुरू असताना अचानक वीजपुरवठा खंडित करण्यात आला व काही वादग्रस्त लोकांकडून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी आंबेडकर जयंतीच्या आयोजकांवरच भादंवि कलम ३०७ म्हणजेच खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्याने संतापाची लाट उसळली.
नेमकं काय घडलं?
१४ एप्रिलच्या रात्री गावात आंबेडकर जयंतीचा उत्साहात कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी अचानक लाईट बंद पाडून समाजकंटकांनी जयंती मिरवणुकीवर दगडफेक केली. यात काही कार्यकर्ते जखमी झाले. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवताना जयंती साजरी करणाऱ्या युवकांवरच ३०७ कलम लावल्याने गावात तणाव निर्माण झाला.
वंचित बहुजन आघाडीचा हस्तक्षेप व मोर्चा
या अन्यायाची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडी, चाळीसगाव तालुकाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. वंचितच्या नेतृत्वाखाली संतप्त आंबेडकरी अनुयायी व ग्रामस्थांनी चाळीसगाव येथील प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. “जयंतीवर हल्ला करणाऱ्यांना सोडून आमच्यावरच गुन्हे का?” असा सवाल करत दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई व खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन व गुन्हा माघारी
मोर्चानंतर प्रांताधिकाऱ्यांनी शांतता समितीची बैठक घेतली. वंचितच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. गावातील सलोखा टिकावा यासाठी त्यांनी “गुन्हे मागे घेऊ” असे आश्वासन दिले. त्यानुसार १४ एप्रिल रोजीच फिर्यादीने प्रांताधिकाऱ्यांसमोर लेखी संमती देऊन आंबेडकर जयंती आयोजकांवरील ३०७ चा गुन्हा मागे घेतला.
वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे व प्रांताधिकाऱ्यांच्या मध्यस्थीमुळे सध्या गावातील तणाव निवळला आहे. मात्र, जयंतीच्या वेळीच लाईट बंद करून दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर अद्याप कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी कायम आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे.



