अमळनेरात भव्य तिरंगा यात्रेने वेधले शहराचे लक्ष; भारतीय लष्कराच्या तीनही दलांना केले सामूहिक अभिवादन.

उपसंपादक – कल्पेश महाले
अमळनेर – भारतीय लष्कराच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जगविण्यासाठी समस्त राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीने काल दिनांक 19 रोजी शहरात काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले. सकाळी 8 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून अतिशय शिस्तीने या यात्रेला सुरुवात झाली.यात्रेत सहभागी सर्व नागरिकांनी सुमारे 200 फूट भव्य तिरंगा ध्वज हाती घेतला होता. तर अनेकांच्या हाती लहान मोठे तिरंगा ध्वज फडकत होते.
दरम्यान काश्मीर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली, लोकभावानेचा आदर करत भारतीय लष्कराने थेट पाकिस्तानात घुसून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. भारत देश हा एकसंघ असून तो दहशतवाद खपवून घेणार नाही. भारतीय लष्कराच्या या शौर्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रप्रेमी अमळनेरकरांच्या वतीने या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.सदर रॅलीत डीजे च्या तालावर राष्ट्रभक्तीपर गीत सादर करण्यात आले.सदर रॅलीत संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ, मंगळग्रह सेवा संस्था, खानदेश शिक्षण मंडळ, लायन्स क्लब, रोटरी क्लब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मराठा समाज महिला मंडळ, आय एम ए संघटना, निमा संघटना, होमिओपॅथी असोसिएशन, मुंदडा फाऊंडेशन, प्रताप महाविद्यालय, श्रमसाफल्य एज्युकेशन सोसायटी, खान्देश रक्षक संघटना, व्यापारी संघटना, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, अमळनेर व्हॉईस ऑफ मीडिया, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, सर्व राष्ट्रीय पक्ष, मुस्लिम समाज बांधव, आजी माजी सैनिक, व्यापारी बांधव व समस्त राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
सदर रॅली पाच कंदील चौक,दगडी दरवाजा,पाच पावली, बस स्टँड,महाराणा प्रताप चौक,कचेरी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे पोहोचली. या ठिकाणी सर्वप्रथम खा.स्मिता वाघांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले.यानंतर खासदार वाघ यांनी मनोगत व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व आणि भारतीय सैनिकांनी दाखवीलेले शौर्य याचा आम्हा संपूर्ण भारतवासीयांना अभिमान असल्याचे सांगितले.सुरवातीला प्रास्तविक व सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डीगंबर महाले तर शेवटी आभार अमळनेर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी मानले. दरम्यान शेवटी खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाल्याने मंगळग्रह संस्थेतर्फे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील सचिव एस.बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार केला.