
उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – तालुक्यात मोठ्या उदात्त हेतूने शेतकऱ्यांना हजारोंच्या विहिरी व बेघरांना घरकुल मंजूर केले होते. मात्र पंचायत समिती मधील रोजगार हमी योजना विभागातील एपीओ, टिपीओ, ज्यू इंजिनिअर व वरिष्ठ अधिकारी यांनी परस्पर मंजुरीच्या व जिओ टॅगच्या नावाने प्रत्येक शेतकऱ्यांकडून २० ते २५ हजार रुपये लाच घेऊन आपल्या तुंबड्या भरल्या असल्याच्या तक्रारी माझ्याकडे येत होत्या. एवढे पैसे देऊनही शेतकऱ्यांच्या विहिरींचे व घरकुलांचे बिल निघत नसल्याने अखेर आज काही शेतकरी माझ्याकडे तक्रारी घेऊन आले असता मी स्वतः शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकारी व संबंधितांची चांगलीच कानउघाडणी केली. गोरगरीब शेतकऱ्यांकडून पैसे लुबाडण्याचे हे पंचायत समिती मध्ये सिंडिकेट असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावला आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी पंचायत समितीची प्रतिमा झाली असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर तेथे उपस्थित शेतकऱ्यांसह तात्काळ पोलीस स्टेशन गाठत पंचायत समिती मधील संबंधित भ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात रीतसर तक्रार दिली आहे.
माझी चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना व घरकुल धारकांना विनंती आहे की ज्यांच्याकडून विहिरी व घरकुल मंजुरी साठी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी यांनी पैसे घेऊन फसवणूक केली असेल त्यांनी पुढील दोन दिवसात आपली तक्रार देण्यासाठी माझ्याशी किंवा माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तालुक्यातील सर्व तक्रारदार शेतकऱ्यांना घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे यावेळी माध्यमांशी बोलतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले.