कासोदा येथे आठवडे बाजारानिमित्त विक्रेत्यांची मनमानी; नागरिक हैराण, मुख्य रस्त्यावर माल उतरवल्याने तासनतास वाहतूक कोंडी..!
कासोदा येथे आठवडे बाजारानिमित्त विक्रेत्यांची मनमानी; नागरिक हैराण, मुख्य रस्त्यावर माल उतरवल्याने तासनतास वाहतूक कोंडी..!

कासोदा, ता. एरंडोल येथे आठवडे बाजाराच्या दिवशी किराणा विक्रेत्यांकडून मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटली जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टी.टी.एस. चौक ते गरीब नवाज दर्ग्यापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
आठवडे बाजाराच्या निमित्ताने परवानगी नसताना अनेक विक्रेते थेट रस्त्यावरच ठिय्या मांडून बसत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले असून, दुचाकी व चारचाकी वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक व रुग्णवाहिकांना देखील याचा मोठा फटका बसत आहे.
स्थानिक रहिवाशांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी तक्रारी केल्या. मात्र, ठोस कारवाई होत नसल्याने किराणा विक्रेत्यांची मनमानी दिवसेंदिवस वाढतच आहे. “रस्ता हा चालण्यासाठी आहे की दुकाने थाटण्यासाठी, हेच कळत नाही. तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
दर आठवड्याला हीच परिस्थिती उद्भवत असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात रोष वाढत आहे. संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावीत व विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे…!



