भारतीय सेनेच्या सन्मानार्थ चाळीसगाव येथे आयोजित तिरंगा यात्रेत उसळला जनसागर.

उपसंपादक – कल्पेश महाले
चाळीसगाव – पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जे धाडस दाखवत ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं, त्यातून आपली सेना केवळ शौर्यवानच नव्हे तर अतुलनीय आहे, हे पुन्हा सिद्ध झालं. या यशाच्या पार्श्वभूमीवर, आपल्या भारतीय सेनेच्या सन्मानार्थ आज दिनांक १९ मे रोजी चाळीसगाव शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत खासदार स्मिताताई वाघ, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह हजारो चाळीसगावकर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आम्ही सर्व एक असल्याचा संदेश दिला. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा व माजी सैनिकांचा चाळीसगावकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सदर तिरंगा यात्रेत चाळीसगाव शहर व ग्रामीण भागातील असंख्य देशप्रेमी नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी आणि लहानग्यांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला. प्रत्येकाच्या डोळ्यांत देशासाठी अभिमान होता, ओठांवर ‘भारत माता की जय’ चा जयघोष होता आणि हाती अभिमानाने फडकणारा तिरंगा होता!
यावेळी आमदार चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, भारतीय सेना आहे म्हणून आपण सुरक्षित आहोत. त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देता कामा नये. चला, एकजुटीने देशप्रेमाचे तेज जपूया, आणि भविष्यासाठी निर्धार बाळगूया — दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या भारताच्या बाजूने खंबीरपणे उभं राहूया! असे आवाहन केले.