
(उपसंपादक – कल्पेश महाले)
चाळीसगांव:- चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांची विशेष शाखा पोलीस मुख्यालय, जळगाव येथे नुकतीच बदली झाली आहे. संदिप पाटील यांनी चाळीसगाव येथील आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व पोलीस आणि जनता यांच्यामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. जनतेचा मित्र अशी प्रतिमा संदिप पाटील यांनी निर्माण केलेली आहे. त्यांच्या कार्यकाळात आणि गुन्ह्यांचे प्रकटीकरण झाले तर सराईत गुंड हद्दपार देखील झाले. शहरात पोलीस चौक्यांची निर्मिती झाली. पोलीस विश्रामगृहाची देखील सुधारणा झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये चांगले विचार रुजविण्यासाठी त्यांनी महाविद्यालयात जाऊन पबोधनात्मक काम देखील केले. त्यांच्या कार्याची आठवण चाळीसगांव शहरवासियांना कायमचीच राहील.
चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून किरणकुमार दशरथ कबाडी यांनी काल सायंकाळी पदभार स्वीकारला. चाळीसगाव येण्यापूर्वी ते अजनी पोलीस स्टेशन व नियंत्रण कक्ष नागपूर येथे कार्यरत होते. त्यांची पोलीस खात्यातील सेवा जवळपास ३० वर्षे झालेली आहे. त्यांच्या ३० वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे. मुंबईमध्ये काम करत असतांना गुन्हेगारांमध्ये त्यांनी आपला वेगळा दरारा निर्माण केला होता.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना पुढे या शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे, गुंड व गुन्हेगारांना ठिकाणावर आणण्याचे, वाळू तस्करांचा बंदोबस्त करण्याचे आणि राजकीय दबवाखाली काम न करण्याचे एक मोठे आव्हान असणार आहे.